बोगस टीईटी केलेल्या शिक्षकांची नोकरी धोक्यात

 


शिवार न्यूज नेटवर्क :

आरोग्य विभाग, म्हाडा परीक्षेतील गोंधळानंतर बहुचर्चित राज्य पात्रता परीक्षेतील (टीईटी) भ्रष्टाचाराची शासनाने गंभीर दखल घेत 2013 नंतर रुजू झालेल्या शिक्षकांचे टीईटी प्रमाणपत्र तपासण्याची मोहीम हाती घेतली आहे.

गंडांतर अटळ असून त्याचबरोबर संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल होऊन तुरुंगाची हवा खावी लागणार असल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहे. 

शिक्षक व शाळा मान्यता, वाढीव तुकड्यांना मान्यता यासह शिक्षकांच्या बदल्या, पदोन्नती, वैद्यकीय बिलाबाबत यापूर्वी शिक्षण विभागातील भ्रष्टाचार उघडकीस आला आहे. राज्य परीक्षा परिषदेचे तत्कालीन आयुक्त तुकाराम सुपे यांनी टीईटी परीक्षेत भ्रष्टाचार केला. अपात्र उमेदवारांना उत्तीर्ण करून कोट्यवधी रुपये घेण्याचे प्रकार घडले.

या प्रकरणामुळे शिक्षण क्षेत्र हादरले आहे. परीक्षा सुरू झाल्यापासून उत्तीर्ण परीक्षार्थ्यांचे मूळ टीईटी प्रमाणपत्र तपासण्याचा पोलिसांनी शिक्षण विभागावर दबाव टाकला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने 13 फेब-ुवारी 2013 नंतर अनुदानित, अंशत: अनुदानित, विनाअनुदानित शाळांमध्ये पाचवी ते आठवीपर्यंत रुजू झालेल्या शिक्षकांचे मूळ 'टीईटी' प्रमाणपत्र पडताळणीचा निर्णय घेतला आहे.

त्यानुसार राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्तांनी राज्यातील सर्व शिक्षणाधिकार्‍यांना आदेश दिले. सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांकडून हे प्रमाणपत्र शिक्षण विभागास सादर करण्याची मुदत संपली आहे.

कोल्हापूर जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाकडे 114 व खासगी प्राथमिक शाळांतील 18 शिक्षकांनी प्रमाणपत्र सादर केली आहेत. त्यापैकी प्राप्त 111 टीईटी प्रमाणपत्र पुणे कार्यालयास पाठविली आहेत. काही महिला शिक्षिका प्रसूती रजेवर असल्याने त्यांनी प्रमाणपत्र सादर केली नाहीत. त्यामुळे अडचणी येत आहेत.माध्यमिक शिक्षण विभागातील 96 शिक्षकांनी पेपर 1 व 2 ची मिळून 113 टीईटी प्रमाणपत्रे सादर केली आहेत. कार्यालयीन अधीक्षक ही प्रमाणपत्र घेऊन परीक्षा परिषद कार्यालयासाठी रवाना झाले आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष