ध्येयपुर्तीसाठी प्रयत्नांत सातत्य महत्वाचं -डॉ. विजय सुर्यवंशी



 पुणे / शिवार न्यूज नेटवर्क :

आपल्या क्षेत्रात उत्तम ज्ञान घेतलं, कामात सातत्य ठेवलं तर कुठलाही उद्योजक यशस्वी होतो. यशस्वी होण्यासाठी उच्च शिक्षणाची गरजच आहे असं नाही. ग्रीन वर्ल्ड प्राईड ऑफ इंडिया पुरस्कार स्विकारलेल्या अनेक उद्योजकांपैकी जेमतेम दहावी-बारावी झालेल्या उद्योजकांनी आपापल्या क्षेत्रात भरघोस यश मिळवलेलं आहे, असे उद्गार राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांनी ग्रीन वर्ल्ड प्राईड ऑफ इंडिया पुरस्कार सोहळयात प्रमुख अतिथी म्हणून बोलताना काढले. 

याप्रसंगी प्रमुख अतिथी कॉसमॉस बॅकेचे चेअरमन मिलिद काळे म्हणाले, मराठी मुलांमध्ये उद्योजकतेचा विकास होण्यासाठी त्यांना शालेय जीवनापासूनच उद्योजकतेचे धडे द्यायला हवे. देशाच्या अमृतमहोत्सवी वर्षपुर्तीनिमित्त ग्रीन वर्ल्डने आयोजित केलेल्या या पुरस्कार सोहळयामुळे अनेक उद्योजकांना प्रोत्साहन मिळालं असून अनेक नवतरूण उद्योजक बनण्यासाठी यातून प्रेरणा घेतील. 

ग्रीन वर्ल्डचे अध्यक्ष गौतम कोतवाल याप्रसंगी बोलताना म्हणाले, मराठी तरूणांमध्ये उद्योजकतेची आवड निर्माण व्हावी, आपल्या आजूबाजूला असणार्‍या उद्योजकांबद्दल त्यांना माहिती मिळावी या उद्देेशाने येणार्‍या वर्षात ग्रीन वर्ल्ड शाळा-महाविद्यालयांमध्ये दहा हजार पुस्तकांचं मोफत वाटप करणार आहे. त्यापैकी अडीच हजार पुस्तकांच्या वाटपाचा पहिला टप्पा या कार्यक्रमानिमित्त पुर्ण झाला. 

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाचं औचित्य साधून ग्रीन वर्ल्ड, कॉसमॉस बँक, ए वन ग्रुप ने आयोजित केलेल्या ग्रीन वर्ल्ड प्राईड ऑफ इंडिया पुरस्कार सोहळयात विदर्भ, मराठवाडा व पश्‍चिम महराष्ट्रातील उद्योजकांचा व अधिकार्‍यांचा समावेश होता. या कार्यक्रमात अप्सरा आली फेम सिने अभिनेत्री माधुरी पवार यांनी आपल्या नृत्याने प्रेक्षकांची मने जिंकली. गौतम कोतवाल यांनी लिहीलेल्या चाळीस पुस्तकातील निवडक 31 यशोगाथांचं मराठी पाऊल पडते पुढे या ऑडीओ बुकचं प्रकाशन याप्रसंगी उपस्थितांच्या हस्ते करण्यात आलं. स्टोरीटेल व कुकू एफएम या अ‍ॅपवर ते श्रोत्यांसाठी उपलब्ध झाले आहे. 

ए वन ग्रुपचे संचालक संजय कणेकर, रावेतकर ग्रुपचे अध्यक्ष अमोल रावेतकर, विक्रम इन्फ्राटेक डेव्हलपर्सचे सीएमडी विक्रम गायकवाड, पी.डी.सी.सी. बँकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे, सुहास दबडगावकर, इंडस्ट्रीयल कोर्ट जज पुणे हे या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी होते. 

या कार्यक्रमाचे आयोजन ग्रीन वर्ल्डच्या सोनल कोतवाल, भरतशेट भांबुरे, वरूण सर्वगोड, शाम टाकळकर, पियुष कोतवाल, कमलेश फेरवानी, नितीन जाधव, प्रसन्न जोशी, सुनील ढोरे, सत्यवान घागरे, अजय परदेशी, सुनील म्हेत्रे यांनी केलं तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दिंगबर ढोकळे व मेघना झुझम यांनी केलं. 



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष