राजू शेट्टींची फौज उद्यापासून प्रत्येक कारखान्यावर धडकणार ; जनआक्रोश यात्रेची तयारी पूर्ण
युवा आघाडी प्रमुख बंडू पाटील यांची माहिती
शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :
साखर कारखान्यांनी मागील गळीत हंगामातील थकीत ४०० रुपये या प्रमुख मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे आज जनअक्रोश यात्रा काढण्यात येणार आहे. हेरवाड या ठिकाणी जनआक्रोश यात्रेची पहिली सभा होणार असून या ठिकाणी मुक्काम करण्यात येणार असून या जन अक्रोश यात्रेची तयारी पूर्ण करण्यात आली असल्याची माहिती स्वाभिमानी युवा आघाडी तालुका प्रमुख बंडू पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सदरची जन आक्रोश यात्रा मंगळवारी सकाळी 8 वाजता शिरोळ दत्त कारखाना येथून सुरु होणार आहे. त्यानंतर कुरुंदवाड - गुरुदत्त कारखाना टाकळीवाडी - मजरेवाडी व हेरवाड येथे जन अक्रोश यात्रेची पहिली सभा होणार आहे. व या ठिकाणी मुक्काम करण्यात येणार असल्याचे बंडू पाटील यांनी सांगितले. तब्बल २२ दिवसाची ही पदयात्रा असून ५२२ किलोमीटरची आहे. २२ मुक्काम आणि दररोज २५ किलोमीटर अंतर चालण्यात येणार आहे, ही यात्रा जिल्ह्यातील सर्व साखर कारखाने व तालुक्यातील तालुक्याच्या ठिकाणी व प्रमुख गावातून जाणार असल्याची माहिती पाटील यांनी दिली.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा