अलमट्टी धरणाच्या उंचीवाढीविरोधात छत्रपती ग्रुप लढा उभारणार
शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :
अलमट्टी धरणाची उंची वाढवल्यास शिरोळ तालुक्याला महापुराचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. या संभाव्य संकटाविरोधात छत्रपती ग्रुपने मोठा लढा उभारण्याचा निर्धार केला असल्याची माहिती छत्रपती ग्रुपचे प्रमुख प्रमोददादा पाटील यांनी शिवार न्यूज नेटवर्कशी बोलताना दिली.
प्रमोददादा पाटील म्हणाले, "धरणाची उंची वाढल्यामुळे शिरोळ तालुक्यातील शेती, घरे आणि स्थानिकांचा जनजीवन धोक्यात येईल. महापुरामुळे पाण्याखाली जाण्याचा धोका वाढणार आहे. त्यामुळे शिरोळ तालुक्याच्या हितासाठी आम्ही विविध स्वरूपात जनआंदोलन उभारणार आहोत. या विषयावर सर्व समाजघटक आणि स्थानिक नागरिकांना एकत्र आणून आंदोलनाला व्यापक स्वरूप देण्याचा आमचा प्रयत्न आहे.
तसेच त्यांनी जलसंपदा विभाग व केंद्र शासनाने संभाव्य धोक्याचा अभ्यास करून उंची वाढीचा निर्णय रद्द करावा, अशी मागणी केली आहे. "जर प्रशासनाने योग्य निर्णय घेतला नाही, तर स्थानिक नागरिकांबरोबर आम्ही तीव्र आंदोलन करू," असेही पाटील यांनी स्पष्ट केले.
शिरोळ तालुका अनेकदा महापुराचा फटका सहन करत आहे. त्यामुळे भविष्यात आणखी धोका वाढविणारा कोणताही निर्णय स्थानिकांसाठी अमान्य असल्याचे जनतेच्या भावना आहेत. छत्रपती ग्रुपने या लढ्याचे नेतृत्व करण्याचा निर्णय घेतल्याने तालुक्यातील नागरिकांमध्ये आशा निर्माण झाली आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा