एकही झोपडपट्टीधारक हक्काच्या घरापासून वंचित राहणार नाही : आमदार यड्रावकर
राजीव गांधी नगर मधील नागरिकांच्या वतीने आमदार यड्रावकर व संजय पाटील यड्रावकर यांचा सत्कार
जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :
जयसिंगपूर शहराच्या वसाहतीत झोपडपट्टीधारकांचा मोठा वाटा असून, गेल्या ५०-६० वर्षांपासून त्यांना हक्काची घरे नसल्याने त्यांची मोठी कुचंबना होत होती. मात्र, अखेर झोपडपट्टीधारकांचा प्रश्न मार्गी लागला आहे. यापुढेही एकाही कुटुंबाला घरापासून वंचित ठेवले जाणार नाही, असा विश्वास आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी व्यक्त केला.
झोपडपट्टी नियमितीकरणाचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल आमदार यड्रावकर व माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांचा राजीव गांधी नगर मधील नागरिकांच्या वतीने सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले. या वेळी आमदार यड्रावकर बोलत होते.
या वेळी आमदार यड्रावकर म्हणाले की, झोपडपट्टी नियमितीकरणाचे काम अत्यंत अवघड होते. सरकारी आरक्षण काढण्यापासून सुरुवात करून नगरपालिकेकडे जागा हस्तांतरित करणे, तेथील रस्ते आणि गटारीसाठी लेआउट तयार करणे, अतिक्रमणधारकांची कागदपत्रे गोळा करणे आणि मग त्याची निर्मिती करणे या संपूर्ण प्रक्रियेला अनेक अडथळे होते. मात्र, गेल्या पाच ते सहा वर्षांपासून या प्रक्रियेसाठी सातत्याने प्रयत्न सुरू होते.
या कामादरम्यान अनेक गैरसमज पसरवले गेले होते, पण नागरिकांनी माझ्यावर विश्वास ठेवला. त्यांच्या विश्वासास पात्र ठरणे हे माझे भाग्य आहे. आता या निर्मितीच्या कामाला गती मिळाली असून उर्वरित झोपडपट्टी धारकांनी लवकरात लवकर आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी, असे आवाहन त्यांनी केले.
ज्या नागरिकांना कागदपत्रांसाठी अडचणी येत असतील, त्यांनी संपर्क साधावा. आम्ही त्यांना मदत करू. येत्या आठवड्यात राजीव गांधी नगर मधील ७५ कुटुंबांना अधिकृत कार्ड दिले जाणार आहे. तसेच, आगामी काळात १७०० घरांचे आरक्षण काढून त्यांच्या हक्काची घरे मिळवून देण्याचे काम प्राधान्याने पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन आमदार यड्रावकर यांनी दिले.
यावेळी आमदार यड्रावकर यांनी राजीव गांधी नगरमधील प्रत्येक मुलाने दर्जेदार शिक्षण घ्यावे, दर्जेदार सुविधा मिळाव्यात आणि भविष्यात मोठ्या पदांवर पोहोचावे, यासाठी मी कटिबद्ध आहे, असे ते म्हणाले.
माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर म्हणाले, "स्व. शामरावअण्णा पाटील यड्रावकर यांच्या काळापासून राजीव गांधी नगरमधील नागरिकांशी आमचा जिवाभावाचा संबंध आहे. आम्ही नेहमीच त्यांच्या सुख-दुःखात सहभागी झालो आहोत. त्यामुळेच त्यांना हक्काची घरे मिळावीत, यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले आहेत. एकही कुटुंब वंचित राहणार नाही, याची काळजी घेतली जाईल, असा विश्वास त्यांनी दिला.
राजीव गांधी नगरमधील नागरिकांनी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर आणि माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांचा सत्कार केला. यावेळी सागर माने, अजित पाटोळे, ज्योतीराम जाधव, अमर पाटील, गुलाम शेख, इकबाल इनामदार, जीवन हेगडे, रघुनाथ देशींगे यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा