शिरोळ तालुक्यात पावसाची दडी अन उष्म्याची उडी



अनिल जासूद / शिवार न्यूज नेटवर्क :

जुन महिन्याची १२ तारीख उजाडली तरीही शिरोळ तालुक्यात मान्सुन पावसाचा पत्ता नाही.यामुळे गेले पंधरा दिवस पाऊस थांबला अन उष्मा वाढला अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

  मे च्या मध्यावर शिरोळ तालुक्यात मान्सुनपुर्व पाऊस धो...धो...बरसला.तब्बल पंधरा दिवस एक ही रजा न घेता दररोज धुवाँधार हजेरी लावली.दिवसा थोडी उघडीप दिला तरीही सांयकाळी, रात्रभर झोडपुन काढायचा.धरणातुन कोणत्याही प्रकारचा विसर्ग नसताना फक्त पावसाच्या पाण्यामुळे तालुक्यातील कृष्णा-पंचगंगा नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडले.शेत-शिवारातील सरीतुन पाणीच पाणी साचुन राहीले.

  मे महिन्यातील या पावसामुळे दिवसभर वातावरण ढगाळ राहायचे. पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला.मान्सुनपुर्व पावसामुळे पंधरा दिवस सुर्याचे दर्शनच झाले नाही.

मे महिन्यात आजतागायत असा पाऊस कधीच झाला नाही असे जुने जाणकार सांगतात.इतकेच नव्हे तर मे महिन्यासारख्या ऐन उन्हाळ्यात घरातील,आॅफीसमधील पंखे,वातानुकुलीत एसी,कुलर आदी चा वापर करावा लागला नाही.यामुळे अनेकांनी आपले पंखे व्यवस्थित पॅक करुन सुरक्षित ठिकाणी ठेवुन सोडले. ऐन उन्हाळ्यात यांचा वापर झाला नसल्यामुळे सर्वांची वीजबीलेही कमी आली आहेत.

 मात्र मे महिन्याच्या अखेरीस दडी मारलेला मान्सुनपुर्व पाऊस आता मान्सुन सुरु होवुन जुनचा पंधरवडा संपत आला तरी अजुन बरसला नाही.यामुळे ऐन पावसाळ्यात उष्माचा पारा वाढला आहे.मान्सुनपुर्व पावसामुळे बंद ठेवलेले पंखे,कुलर,एसीचा पुन्हा वापर करावा लागत आहे. 

 जिथे जिथे ढग आहे तिथे अधुन मधुन पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत.मात्र यामुळे उष्म्यामध्ये आणखीनच वाढ होत आहे.

   जिल्ह्यात काही ठिकाणी मान्सुनचा पाऊस होत असला तरी शिरोळ तालूक्यात मात्र अजुनही मान्सुनच्या पावसाचे प्रमाण निरंकच आहे.यामुळे तालुक्यातील नागरिकांना उष्म्याला सामोरे जावे लागत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष