३७५१ रूपयाबाबत तोडगा नाही झाला तर कार्यकर्त्यांनी भूमिगत होवून आंदोलनाची तीव्रता वाढवावी : राजू शेट्टी
कोल्हापूर / शिवार न्यूज नेटवर्क :
सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वपक्षीय कारखानदार एकत्रित येवून ३४०० ते ३४५० पर्यंत पहिली उचल देत आहेत. सदरची उचल आम्हाला मान्य नसून ऊस परिषदेत केलेल्या ३७५१ रूपयाबाबत तोडगा नाही झाला तर कार्यकर्त्यांनी भूमिगत होवून आंदोलनाची तीव्रता वाढवण्याचे आदेश स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी दिले.
सांगली , कोल्हापूर व कर्नाटक सीमाभागात ऊस आंदोलनाची तीव्रता वाढत आहे.राज्य सरकारने साखर कारखानदार व शेतकरी संघटना यांचेसोबत मध्यस्थी करून गळीत हंगाम सुरू होण्यापुर्वी तोडगा काढावी अशी आमची अपेक्षा होती. मात्र राज्य सरकार व कारखानदार या मुद्याकडे दुर्लक्ष करू लागले आहेत. सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांशी साखर कारखान्यांनी एफ. आर. पी. जाहीर केलेली आहे. यामुळे कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सोमवारी सर्व शेतकरी संघटना , कारखानदार व प्रशासनाची बैठक घेऊन मार्ग काढण्याचे मागणी केली आहे.
गतवर्षी साखर कारखान्यांनी साखरेसह उपपदार्थातून चांगले पैसे मिळविले आहेत. यावर्षीसुध्दा साखर , इथेनॅाल , मोलॅसिस , बगॅस या उपपदार्थांना चांगला दर मिळत आहे. काटामारी व रिकव्हरी चोरीतून शेतक-यांची लूट केली जात आहे. हंगामाच्या सुरवातीस कारखानदारांनी गुंडाच्या करवी संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करत आहेत. यामुळे शेतक-यांनी ऊसाला चांगला भाव पाहिजे असल्यास संघटित होवून आंदोलनाची तीव्रता वाढवावी लागेल.
प्रशासन व राज्य सरकारने तातडीने तोडगा नाही काढला तर राज्याचे मुख्यमंत्री ५ नोंव्हेंबर रोजी कोल्हापूर जिल्ह्याच्या दौ-यावर येत आहेत. त्या पार्श्वभुमीवर कार्यकर्त्यांनी भुमिगत होवून आंदोलनाची तयारी करावी त्याबरोबरच ७ नोव्हेंबर रोजी निगवे ता. करवीर येथून पुढील आंदोलनाची घोषणा करण्यात येणार आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा